मुंबई :
राज्यभरात जवळपास सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर गुरुवारी (दि. 20) सकाळी 10 वाजताच्या सुमारास दोन इमर्जन्सी अलर्ट आले. आता हा काय प्रकार आहे, अशा भावना सर्वजण व्यक्त करीत आहेत. मात्र याबाबत घाबरून जाऊ नये. आपल्या फोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर सुविधा सुरू करण्यासाठी केलेली उपाययोजना आहे.







नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात, कधी भूकंप, त्सुनामी, महापूर, चक्रीवादळ, दुष्काळ आणि इतर सर्व प्रकारच्या आपत्तीच्या काळात नागरिकांना वेळेत माहिती मिळणे आवश्यक असते. आपत्तीपूर्वी नागरिकांना माहिती मिळाल्यास त्यावर खबरदारी घेणे सोपे जाते. यासाठी केंद्र शासनाने मोबाईल कंपन्यांना निर्देश दिले होते.
एप्रिलमध्ये सरकारने मोबाईल कंपन्यांना फोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर (Emergency alert) देणं बंधनकारक केलं होतं. सरकारच्या आदेशानंतरही स्मार्टफोन कंपन्यांनी फोनमध्ये इमर्जन्सी अलर्ट फीचर न दिल्यास त्या कंपन्यांवर कारवाई केली जाणार होती. म्हणून लगेच सर्व कंपन्यांनी हे फिचर आणले होते व त्यामुळेच हा इमर्जन्सी अलर्ट मिळालेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अलर्ट च्या माध्यमातून मोबाईल मधील इमर्जन्सी अलर्ट पिक्चर या सेटिंग मध्ये जाता येते. तिथे ही सेटिंग सुरू केल्यास कंपन्यांकडून आपत्कालीन परिस्थितीत येणारे इमर्जन्सी संदेश तात्काळ प्राप्त होण्यासाठी मदत होईल. अचानक आलेल्या इमर्जन्सी अलर्टमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.








