नवी दिल्ली :
मराठा आरक्षणाच्या खटल्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. निकाल एका महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो, होळीच्या सुटीनंतर ही तारीख जाहीर करण्यात येऊ शकते, असं सांगितलं जात आहे.







102 वी घटनादुरुस्ती व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना आणि 50 टक्क्यांवर आरक्षण देण्यात यावं की नाही, या दोन मुद्द्यांवर ही सुनावणी झाली. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या अशा सर्व बाजूंनी युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होती. ती आता पूर्ण झाली आहे.राज्य सरकारने 2018 मध्ये घेतलेला निर्णय घटनात्मक असल्याचं केंद्र सरकारने यामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच देशातील सात-आठ राज्यांनी आरक्षणासाठी 50 टक्क्यांच्या अटीबाबत पुनर्विलोकन करण्याची मागणी केलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी आहे.








