नागपूर:
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. चिकन, अंडी खाणार असाल तर 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. तसेच बर्ड फ्ल्यू बाबत अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सुनील केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला दिला. राज्यात फक्त परभणीत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याचं आढळून आलं आहे. राज्यात इतरत्रं बर्ड फ्ल्यू झाल्याचं अद्याप निदान झालेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी खाऊ शकता. फक्त 70 ते 80 डिग्री तापमानावर अर्धा तास चिकन- अंडी शिजवा आणि त्यानंतर खा. अर्धा तास चिकन- अंडी शिजवल्यास त्यातील जीवाणू मरून जातात. हे मी सांगत नाही तर संशोधनातून तसं सिद्ध झालं आहे, असं केदार यांनी सांगितलं.
अफवा पसरवल्यास गुन्हा
बर्ड फ्ल्यूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. कोरोना संकटाच्या काळात चिकनमधून कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी सरकारने गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती, असंही त्यांनी सांगितलं.