रत्नागिरी :
मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले तरीही जुलै महिन्यात पूर परिस्थिती उद्द्धवली आहे. दीड महिन्यात घरे, गोठे, सार्वजनिक मालमत्तांचे १ कोटी ३५ लाखांचे नुकसान झाले. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर सतर्कता म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील १५० दरडप्रवण गावांतील ५७१ कुटुंबांमधील १७०१ लोकांचे स्थलांतर करण्यात आले.







मागील पंधरा दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. वेगवान वाऱ्यामुळे झाडे पडुन घरा-गोठ्यांचे नुकसान वाढले आहे. पुरामुळे चिपळूण, खेड, दापोली, राजापुरात नुकसानीची नोंद झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भुस्खलनाचाच आहे. इर्शाळवाडतील घटनेमुळे जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांवरील लोकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याची कडक अंमलबजावणी केली गेली.
पुरामुळे थोका होऊ शकतो, अशा २४ गावांतील १३० कुटुंबांतील ४७७लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एकूण ७०१ कुटुंबांतील २०७८ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. स्थलांतर करताना अनेकांनी आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यांचे स्थलांतर समाजमंदिर, शाळेत करण्यात आले आहे, अशा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी संबंधित तहसीलदार कार्यालयाकड़े दोन लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पुरवठा विभागाकडून त्यांना धान्य देण्याची व्यवस्था करावी, तसेच आवश्यक तेथे शिवभोजन थाळीचा वापर करावा, अशा सूचना दिल्या आहे.








