पुणे :
पुनावळे येथे होऊ घातलेल्या कचरा डेपोला परिसरातील स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यासाठी नागरिकांनी आज (रविवारी, दि. २९) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य संकटात येईल. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीला देखील नुकसान होईल, असे नागरिकांनी राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत दोन दिवसांनी आपण निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी नागरिकांना आश्वासन दिले.







यावेळी पुनावळे, हिजवडी, मारुंजी ग्रामस्थ, मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे, गणेश सातपुते, उपशहर अध्यक्ष राजु सावळे, उपविभाग अध्यक्ष विशाल साळुंखे, मारुजी शहरअध्यक्ष सतोष कवडे आदि उपस्थित होते.
पालिकेने सन 2008 मध्ये पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर केला. त्यावेळी पुनावळे भागात नागरीकरण झालेले नव्हते. मात्र या १५ वर्षात मोठे नागरीकरण झाले असून पुनावळे परिसरातील लोकसंख्या एक लाख पेक्षा अधिक झाली आहे. इथले नैसर्गिक वातावरण, बाजूला असलेले आयटी पार्क आणि पुनावळे येथे आरोग्य, शिक्षण, गृह प्रकल्प या सुविधांमुळे नागरिक इथे राहण्याला पसंती देत आहेत.
इथे होऊ घातलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रहिवासी परिसरापासून काही मीटरच्या अंतरावर आहे. कचरा डेपोमुळे पुनावळे येथील नैसर्गिक संपत्ती नष्ट होईल. नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागेल. हा प्रकल्प शहराच्या पश्चिम दिशेला आहे. हवेचा प्रवाह नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे असतो. हा कचरा डेपो झाल्यास यातील दुर्गंधी पुनावळे भागासह वाकड, ताथवडे, हिंजवडी आयटी पार्क, मारुंजी या भागात पसरणार आहे. यातून देखील अनेक समस्या उद्भवतील. पालिका आयुक्त डिसेंबर 2023 पर्यंत हा कचरा डेपो सुरु करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे यामध्ये लक्ष घालून पुनावळेकर नागरिकांना कचरा डेपोपासून मुक्त करावे, अशी विनंती नागरिकांनी राज ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मला दोन दिवसांचा वेळ द्या. मी प्रशासनाशी बोलतो. कचरा डेपोसाठी ही जागा का निवडली. इथल्या कचरा डेपोसाठी पर्यायी जागा पाहता येईल का, याबाबत प्रशासनाशी चर्चा करून मग पुढील निर्णय घेऊ.”







