बाणेर :
गेल्या अनेक दिवसापासून बाणेर, बालेवाडी, पाषाण, भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अचानक भासू लागलेल्या पाणी टंचाई चे गुपीत नेमके काय आहे बाणेर बालेवाडी चे पाणी नेमके मुरते कुटे, याचा शोध माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रत्यक्ष घटना स्थळी जावून घेतला आहे.
याची माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, पाषाण येथील पंपिंग स्टेशनवर प्रत्यक्ष जाऊन बाणेर बालेवाडीला निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाई बाबत आढावा घेतला. यावेळी पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी गेल्या ३ महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याची माहिती मिळाली, जवळपास २४ तास दररोज हे पाणी वाहत असुन सुमारे १ करोड लिटर पिण्याचे पाणी रामनदीला जाऊन मिळत आहे. यामुळेच बाणेर-बालेवाडी भागाला दैनंदिन सुमारे १ करोड लिटर पाणी पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आले.
हि समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकार्यांना माहिती असुन सुद्धा जाणीव पुर्वक का सोडवण्यात आली नाही..? असा प्रश्न यावेळी अमोल बालवडकर यांनी केला
गेली ३ महिन्यांपासुन बाणेर-बालेवाडीचे हजारो नागरीक या पाणी समस्येमुळे त्रस्त आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्विकारत नसुन जाणीवपुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पुढे माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, म्हणुन येत्या ४ दिवसात जर बाणेर-बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर माझ्या समस्त बाणेर-बालेवाडीतील नागरीकांना आवाहन आहे की आपण पुणे महानगरपालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसुन जाणीव पुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.अजित पवार यांच्याकडे फोन किंवा मेसेज द्वारे करावी हि विनंती करत आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच स्थानिक आमदार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व पुणे शहराचे खासदार गिरीष बापट यांच्याकडे या विषयाबाबत तक्रार करणार असुन या सर्वांनी बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता लक्ष घालावे अशी विनंती करणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले.