वंदे भारत एक्सप्रेसने बिना बँकर घाट पार केला, कसारा घाटातून चाचणी यशस्वी…

0
slider_4552

मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट वंदे भारत एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात चाचणीसाठी दाखल झाली आहे. येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई येथून या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंदे भारत घाटामधून कसा प्रवास करते याची चाचपणी घेण्यात आली.

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून जवळपास सकाळी 11.00 वाजता वंदे भारत निघाली आणि इगतपुरी दरम्यान ती 1.00 ते 1.30 वाजेच्या सुमारास पोहोचली. या गाडीमध्ये रेल्वेचा ठराविक स्टाफ आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणी फेऱ्या

कसारा विभाग घाट सेक्शन असल्याने येथून मार्गस्थ होणाऱ्या रेल्वे गाड्यांना घाट चढण्यासाठी मागून बँकर (इंजिन) लावावे लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेसने बिना बँकर घाट पार केला असून तिला कुठल्याही प्रकारचे बँकर लावण्यात आलेले नाहीत. या गाडीच्या दोन ते तीन दिवस चाचणी फेऱ्या होणार आहेत असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

वंदे भारत ट्रेन बघण्यासाठी नागरिकांनी इगतपुरी स्थानकावर गर्दी केली होती. ही गाडी मंगळवार वगळता नियमितपणे मुंबई ते शिर्डी धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सकाळी 6.15 वाजता शिर्डीकडे रवाना होणार आहे, तर शिर्डी रेल्वे स्थानकात दुपारी 12.10 वाजता पोहोचणार आहे, तसेच शिर्डीहून सायंकाळी 5.25 वाजता मुंबईच्या दिशेने निघून मुंबईत रात्री 11.18 वाजता पोहोचणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी 5 तास 55 मिनिटात प्रवास होणार आहे. मुंबई – सोलापूर बरोबरच मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असल्याने साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

See also  काँग्रेसची भारत जोडो यात्रा तळपत्या मशाली घेऊन महाराष्ट्रात दाखल..