पुणे :
राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायतीचा आज सोमवारी निकाल लागणार आहे. या निकालानंतर गुलाल उधळत विजयी मिरवणुका काढणार असाल तर थोडे थांबा. निकालानंतर गुलाल उधळणं, मिरवणुका काढणं, फटाके फोडणं, अन् विजयी उमदेवारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावणेही तुम्हाला महागात पडू शकते.




ग्रामपंचायत निकालाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकार करण्यास मज्जाव करण्यात आला असून हा प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यात या प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे.
राज्यातील 12 हजार 711 हजार ग्रामपंचायतींचा निकाल उद्या सोमवारी लागणार आहे. राज्यात कोरोनाचं संकट कायम असल्याने निवडणूक निकालानंतर मिरवणुका निघू नये म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एक आदेश जारीही केला आहे. या आदेशानुसार सोमवारी पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी घालण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे. औरंगाबादसह काही जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे हे आदेशच जारी केले आहेत. त्याशिवाय निवडणुकीचं कुणीही सेलिब्रेशन करू नये म्हणून हॉटेल, ढाबे आणि खानावळी बंद ठेवण्यात येणार आहेत.








