पुणे :
राज्यावर ऐन दिवाळीमध्ये आलेलं पावसाचं सावट दूर झालं आहे. दिवाळीची सुरुवात होताच वातावरणात गारवा निर्माण झालाय. दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहू शकते त्यामुळे तापमानातही चढ-उतचार असतील, अशी माहिती हवामान खात्याने दिलीये.







पुढील आठवडाभर राज्यात साकळी धुके पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुढील दोन दिवसांत मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात थंडी परतणार आहे. गेल्या २ दिवसांत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानंतर काल आणि आज सर्वत्र आकाश निरभ्र आहे. शनिवारी दुपारी कमाल तापमानात घट झाली होती. मुंबई आणि पुण्यात सध्या कोरडे वातावरण असून कोकणात अद्याप काळे गढ दाटून आल्याचे दिसत आहेत.
कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने काही निवडक ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. त्यामुळे वातारणातील तापमानात बदल होऊन पुढील दोन दिवसांत राज्यात पुन्हा एकदा गुलाबी थंडीला सुरुवात होईल. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस बरसला असला तरी उत्तरार्धात पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दिवाळीमध्ये दरवर्षी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. मात्र यंदा दिवाळी आधी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चिंतेत होता. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस पुढे असाच सुरू राहिला असता तर शेतीचे आणखी नुकसान झाले असते. मात्र आता पावसाने माघार घेतली असून पुन्हा एकदा गुलाबी थंडी येणार असल्याने बळीराजाही सुखावला आहे








