मुंबई :
कालपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह अनेक भागात काल मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे पहिल्याच पावसात मुंबई- अहमदाबाद महामार्ग खचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा महामार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई- अहमदाबाद महामार्ग खचल्याचे समोर आले आहे. वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शोरूमजवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
महामार्ग खचल्यामुळे अनेक वाहनांचे टायर खड्ड्यांमध्ये अडकले. ज्यामुळे पुढील प्रवास खोळंबल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. महामार्ग खचल्याने वाहतूक बंद होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पुढील तीन-चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे तर सरासरी ५०-६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे