पुणे :
राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात अद्याप पावसाने दडी मारली आहे. अशातच आजही अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी अरिंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.







रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अॅरिंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यामध्येही आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छ, संभाजीनगर, जालना, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात कुठे-कुठे पावसाची शक्यता ?
आजपासून मुंबई, पुणे, ठाणे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा-विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर मान्सूनची चाल अचानक संथ झाली. परिणामी अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चितेत वाढ झाली.








