मुंबई :
पुणे जिल्ह्यातील एकवीरा देवी मंदिर येथे तसेच राजगड किल्ला येथे रोपवे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे यासाठी भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळ यांच्यासोबत पर्यटन संचालनालयाचा (डीओटी) सामंजस्य करार करण्यात आला.
हे दोन्ही रोपवे प्रकल्प बांधा, वापरा, हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर बांधण्याचे प्रस्तावित आहे. पर्यटन विभागाचा हा पथदर्शी प्रकल्प असेल.
यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, दोन्ही सामंजस्य करार राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देणारे आहेत.







एकविरा देवी मंदीर व राजगड किल्ला ही ठिकाणे राज्याची शक्तीपीठ व भक्तीपीठ आहेत. याठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे. आज झालेल्या करारानुसार भारतीय पोर्ट रेल व रोपवे महामंडळाने सर्व बाबींची एका वर्षात पुर्तता करुन पुढील वर्षी या दोन्ही ठिकाणी भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.
राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनामुळे दीड वर्षापासून प्रत्यक्षात पर्यटन बंद असले तरी भविष्यात राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने विभागाने अनेक निर्णय घेतले आहेत. राज्याचे बीच शॅक धोरण, कृषी पर्यटन धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. आता साहसी पर्यटन धोरणही लवकरच जाहीर होत आहे.








