रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. देवरुख संगमेश्वरच्या दरम्यान भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.४६ रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. तर सातार्यातील कोयना धरण परिसर सुद्धा भूकंपाने हादरला.
भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी होती.
देवरुख संगमेश्वरच्या पट्ट्यात रविवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची नेमकी जागा माहीत नसली तरी संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. ४.४६ स्केलचा भूंकप होता. त्याचे केंद्र हे पाच किलोमीटरच्या परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यापाठोपाठ सातार्यातील कोयना धरण परिसर सुद्धा भूकंपाने हादरला. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल एवढी होती. सायंकाळी ५ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कोयना धरणापासून वारणा खोरे येथे १२ कि.मी. अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदु होता.
याआधीही मार्च महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख, साडवली परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली होती. अनेकांच्या घरातील भांडी ठेवण्याचे रॅक हलण्याने भूकंपाची जाणीव झाली होती. तर काही जण झोपेत असताना बेड हल्ल्याने भीतीने जागे झाले होते. पण, सौम्य धक्के असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
त्याआधी फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान चार वेळा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. कोयनेपासून ४१.६ किलोमीटर अंतरावर खेडमधील खोपी, शिरगाव, सवेंनी, मोहाने, अस्तान, आंबवली, बिजघर, तिसंगी, एनवरे, ऐनवली, तळे, यांसारख्या ४७ गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू खेड रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील ईशान्य बाजूस चार किलोमीटर अंतरावर तर चौथा धक्का खेडमधील खोपी गावाच्या नैऋत्य बाजूस तीन किलोमीटर अंतरावर होता. सर्वात मोठा धक्का पहाटे ५.२९ वाजता बसला असून या धक्याची तीव्रता ३.८१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती तर इतर तीन धक्के २.६, २.८, व २.३ एवढ्या रिश्टर स्केलचे होते.