मुंबई :
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.







अशावेळी मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नंतर आता मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार असल्याची भूमिका शिक्षण विभागानं घेतली आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत कोरोना स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
रुग्णवाढ झाल्यास स्थानिक पातळीवर निर्णय होणार
राज्यात काल कोरोनाचे 11 हजार 877 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात मुंबईत परिसरातील रुग्णांचा आकडा 10 हजार 394 इतका होता. त्यामुळे मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. असं असलं तरी इतर भागातील शाळा सुरुच ठेवल्या जाणार आहेत. भविष्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
मुंबईत शाळा बंद निर्णय!
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.
पुण्यात तूर्तास शाळा बंदचा निर्णय नाही
पुण्यात काल कोरोनाचे 524 नवे रुग्ण आढळून आले. तसंच 36 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असंही महापौर म्हणाले.








