नाशिक ।
मनसेसाठी आनंदाची बातमी असून नाशिक जिल्हयातील पहील्या ग्रामपंचायतीत मनसेचे ४ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील जळगाव चौंढी ग्रामपंचायतीच्या ४ जागांवर मनसेचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. ९ जागांसाठी होणार्या निवडणूकीसाठी मनसेने ७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहे. त्यापैकी ४ जागा या बिनविरोध झाल्या आहेत.







राज्यासह जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकांचा धुराळा उडाला आहे. जिल्हयातील सुमारे ५ हजार जागांसाठी १६ हजार उमेदवार निवडणुक रिंगणात असून या निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. ग्रामीण भागात निवडणुकीचं महत्व वेगळे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हा गाव पातळीपर्यंत रूजलेला पक्ष आहे. राज ठाकरेंचा पक्ष मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या मोठया शहरात अस्तित्वात असल्याची टीका नेहमी होत असते. पण यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे पहिल्यांदाच गावपातळीच्या राजकारणात आपली ताकद आजमावत आहे. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या निवडणूकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात संपर्क वाढविण्याची संधी मनसेला आहे.
नाशिक जिल्हयातील ६२१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मनसेने २०० उमेदवार दिले आहेत. आज जळगाव चौंढी ग्रामपंचायतीत ४ जागा बिनविरोध झाल्या. ४ जानेवारी पर्यंत माघारीची मुदत असून २० ते २२ जागा या बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. असे अनंत सूर्यवंशी मनसे जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले.
राज ठाकरे लवकरच नाशिक दौर्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नविन वर्षात नाशिक दौर्यावर येत आहेत. ११ जानेवारीनंतर ठाकरे हे नाशकात येणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हयात मेळावा घेण्याची तयारी सुरू आहे.








