नवी दिल्ली :
चीन जपान अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलीय. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज अति महत्वाची बैठक घेतलीय.
या बैठकीनंतर केंद्र सरकारने अलर्ट नोटीस जारी केलीय. कोरोना अजूनही संपलेला नाही, कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार राहा असं मांडवीय यांनी म्हटलंय. देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना कोरोना अलर्ट नोटीस जारी करण्यात आलीय. या शिवाय देशात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती लागू होण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
शाळा, कॉलेजमध्ये काळजी घेण्याचं आव्हान
बैठकीत सर्वात महत्त्वाची चर्चा झाली ती शाळा-कॉलेजमध्ये काय खबरदारी घेतली जावी यावर. सगळ्यात जास्त गर्दी ही शाळा-कॉलेजमध्ये होत असते. त्यामुळे इथे जास्त काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची सातत्याने तपासणी करावीत असंही सांगण्यात आलं आहे. ज्यांना आधीपासूनच काही आजार आहेत, त्यांना ताप किंवा सर्दी झाली तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष देण्याचे आदेश
तब्बल दोन वर्ष कोरोनाचं महाभंयकर दुष्टचक्र अनुभवल्यानंतर आता कुठे आपण मोकळा श्वास घेतोय. अशातच चीन आणि अमेरिकेतून धोक्याची घंटा वाजू लागलीय. चीनमध्ये परिस्थिती पुरती हाताबाहेर गेलीय. इथं 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला पाठवलं पत्र पाठवलंय.
आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना
केंद्राच्या ऍडव्हायजरीनुसार (Advisory) चीन, अमेरिका, जपान, ब्राझील, कोरियात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. त्यामुळे सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आलीय. जिनोम सिक्वेन्सिंगवर ( Genome Sequencing) लक्ष केंद्रित करा असंही सांगण्यात आलंय. तसच कोरोनाचा (Corona) प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही सूचना देण्यात आलीय.
इशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका
एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरू असताना भारतातही गेल्या 24 तासात कोरोनाचे 112 नवे रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका सर्वांनाच बसलाय. कुणी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलय, कुणाची नोकरी गेली तर कुणाचा उद्योग बुडाला…त्यामुळे केंद्राच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका..तुमची सतर्कताच या नव्या संकटाला रोखू शकेल.