पुणे :
यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा प्रचंड वेगाने प्रगती करीत असून, तो शनिवारी 17 मे रोजी मालदीव आणि श्रीलंकेत दाखल झाला. हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, येत्या 21 मे रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे केरळ आणि कर्नाटकात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
यंदा हवामानातील दाब प्रणाली वेळेवर अनुकूल झाल्यामुळे मान्सून फारसा अडखळत न थांबता जलदगतीने पुढे सरकत आहे. 13 मे रोजी मान्सून अंदमान बेटांवर पोहोचला. त्यानंतर 15 मे रोजी बंगालच्या उपसागरात आणि 17 मे रोजी श्रीलंकेत दाखल झाला आहे.
या वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे केरळ आणि कर्नाटकात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, त्या भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आगामी सात दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून, त्याचा परिणाम पुढील मान्सून प्रवासावरही होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर हवामान विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत. मान्सूनच्या वेगवान गतीमुळे देशातील पर्जन्यमानावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.