नवी दिल्ली :
दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 49 धावांनी पराभव केलाय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. रिले रुसोनं 48 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 18.3 षटकांत 178 धावांवर गारद झाला. भारताकडून दिनेश कार्तिकनं सर्वाधिक 41 धावा केल्या. मात्र, या पराभवाचा मालिकेच्या निकालावर परिणाम झाला नाही. भारतानं याआधीच मालिका 2-1 ने जिंकली आहे. टीम इंडियानं पहिला टी-20 आठ विकेटनं आणि दुसरा टी-20 16 धावांनी जिंकला होता.







टीम इंडियानं मालिकाच जिंकली
टीम इंडियाने पहिला टी-20 आठ विकेटनं आणि दुसरा टी-20 16 धावांनी जिंकला. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची टी-20 मालिका होती. टीम इंडिया बुधवारी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये भारताला 16 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि 17 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध दोन सराव सामने खेळायचे आहेत.
गुरुवारपासून शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातील एकही खेळाडू वनडे संघात नाही. श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
यामध्ये भारताचे युवा स्टार्स दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघात तेच खेळाडू असतील, जे सध्या टी-20 मालिकेचा भाग होते. 6, 9 आणि 11 ऑक्टोबरला तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.








