विशाखापट्टणम :
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला 10 विकेट्स राखून पराभूत केले. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला होता.







मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यानंतर वनडे मालिका 1-1 अशा बरोबरीवर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात अष्टपैलू मिचेल मार्श याने महत्वाचे योगदान दिले. त्याने आपल्या एकतर्फी फलंदाजीने सामन्यातील भारताचे आव्हान अक्षरशः काढून टाकले.
मालिका बरोबरीत आणण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय फलंदाजांना डोके वर काढू दिले नाही. 49 धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मिचेल स्टार्कचे पाच व ऍबॉट आणि एलिस यांच्या प्रत्येकी दोन बळींमुळे भारताचा डाव 117 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मार्श व हेड जोडीने अवघ्या 11 षटकात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
मिचेल मार्श याने सामना लवकर संपवण्याचा इराद्याने पहिल्या षटकापासून आक्रमक धोरण स्वीकारले होते. सिराज, शमी व हार्दिक पंड्या या भारताच्या तीनही वेगवान गोलंदाजांवर त्याने हल्ला चढवत 28 चेंडूवर अर्धशतक झळकावले. मार्शने अखेरपर्यंत नाबाद राहत 36 चेंडूत 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या.








