पुणे :
येत्या 21 फेब्रुवारी बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. पण त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय.
कारण शिक्षकेतर कर्मचा-यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शनिवार वाड्यापासून तर शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध न्याय हक्काच्या मागण्यांसंदर्भात शिक्षण आयुक्त कार्यालयावर महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महाआक्रोष मोर्च्यात राज्यभरातील मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाने दिलाय. शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संपामुळे मुंबई विद्यापीठातल्या परीक्षाही स्थगित करण्याची वेळ ओढावली होती… तेव्हा दहावी-बारावीच्या परीक्षांचं काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय.
शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मागण्या काय आहेत?
शिक्षकेतर कर्मचारी भरती त्वरीत सुरु करा
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा वर्ष योजनेचा लाभ द्या
जुनी पेन्शन योजना लागू करा
अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी
अनुकंपा नियुक्तीवरीला मान्यता तात्काळ देण्यात यावी
या मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांनी दहावी बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. शासन वेळोवेळी वेगवेगळी उत्तरे देऊन संघटना पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे.
या विरोधात आज महाराष्ट्र राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी हे आक्रमक झाले आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर पंधरा मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. परीक्षा काळामध्ये सरकारला सहकार्य करणार नाही. तसेच दहावी बारावीच्या परीक्षा देखील होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.