मुंबई :
भारतीय संघ जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेतील चौथा आणि पाचवा सामना खेळण्याच्या तयारीत आहे, तेव्हा एक संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असेल. पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या मालिकेतील पूर्वनियोजित पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ गुरुवारी सकाळी इंग्लंडला रवाना झाला आहे.







सध्या रोहित शर्मा व्यतिरिक्त विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, प्रसिद कृष्णा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी आणि केएस भरत इंग्लंडला रवाना झाले आहेत. बाकीचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा टी-२० सामना झाल्यानंतर रवाना होईल. या दरम्यान भारताचा सलामीचा फलंदाज केएल राहुलच्या दुखापती बाबत चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “राहुल अद्याप स्नायूंच्या दुखापतीतून बरा झालेला नाही. त्यामुळेच राहुल सध्या इंग्लंडला रवाना होत नाहीये. त्याला बरे होण्यासाठी आणखी वेळ लागेल. त्याच्या लवकर बरे होण्याची आशा फार कमी आहे.”
भारताचे दोन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. एक संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळेल तर दुसरा संघ आयर्लंडविरुद्ध टी-२० सामने खेळेल. पंत वगळता सर्व खेळाडू १-५ जुलैच्या कसोटीसाठी रवाना झाले आहेत. ज्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
केवळ एका कसोटी सामन्यासाठी निवड समिती राहुलच्या जागी अन्य कोणत्याही खेळाडूचा समावेश करणार नसल्याचे समजते. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, ‘जर फिटनेसची काही समस्या असेल तर तुमच्याकडे शुभमन गिल आहे ज्याने अनेक कसोटी सामन्यांमध्ये सलामी दिली आहे. याशिवाय पुजाराही ओपनिंग करू शकतो. हा १७ जणांचा संघ असून १६ जण आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही.’
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.








