मुंबई :
कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सरकारने लॉकडाउन लागू केला होता. या लॉकडाउनच्या काळातच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता गृहमंत्री अनिल देशमुखांनी या संदर्भात मोठी घोषणा केली असून, हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे म्हटले आहे.
राज्यभरात भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत सुमारे 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचबरोबर 1 हजार 347 वाहनमालकांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. लॉकडाउन काळात नियम तोडणाऱ्या नागरिकांना 28 कोटी 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. याचबरोबर 37 हजार 42 जणांना अटक करण्यात आली होती. तसेच, 96 हजार 340 वाहने जप्त करण्यात आली होती.
सुरुवातील कडेकोट संचारबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जसजशी कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत गेली तसतशा लोकांना अनेक गोष्टींसाठी सूट देण्यात आली. मात्र, या काळात अनेकांनी नियमांचं उल्लंघन केलं. अनेकजण संचारबंदीच्या नियमांना धाब्यावर बसवून घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या विरोधात कठोर कारवाई केली होती.