पुणे :
पुणे महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली.







पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलची बैठक आज बालगंधर्व येथे पार पडली. यावेळी जवळपास सर्वच पदाधिकार्यांनी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मनपा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा दिला. मात्र, मनपा निवडणूक आघाडी करुन लवढवायची की स्वबळावर याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा ठराव कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे अजित पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, दिपाली धुमाळ, रविंद्र माळवदकर, प्रदीप देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील महापालिकांची निवडणूक एप्रिल – मे महिन्यात होणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. यावेळी मनपा निवडणूक आघाडी करुन लढवायची की स्वबळावर याबाबत सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्टेजवरुन विचारण्यात आले. त्यावेळी बहुतांश सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच कल्ला करत स्वबळाचा नारा दिला आहे. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी याचा निर्णय अजित पावार घेणार आहेत.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचेनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीने आपला सूर बदलला. प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना पाहता या निवणूकीत राष्ट्रवादीला फायदा होईल. त्यामुळे ही निवडणूक स्वबळावर लढवावी आणि निवडणुकीनंतर आघाडी करावी अशी भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्यामुळे येत्या निवडणुकीत पुण्यात आघाडी होणार की सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार हे येत्या काळात समजले.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी आघाडी करुन सरकार स्थापन केले आहे. राज्यात आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर आघाडी करण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत देखील स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांकडून वरिष्ठांकडे केली जात आहे. आघाडी केल्यास पक्षातील नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही अशी भूमिका काहींनी घेतली आहे.







